भाग ४ - लैंगिक मुक्तितून स्त्री मुक्ती

१-       विल्यम रीचने नामकरण केलेल्या सेक्स पॉझिटीव्ह या विचारसरणीची मध्यवर्ती कल्पना आहे की, समाजातल्या लैंगिक समस्यांचं मूळ हे लैंगिकतेकडे पाहाण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनात आहे. जर या समस्यांवर तोडगा काढायचा असेल तर या दृष्टिकोनातच आमूलाग्र बदल केला पाहिजे. यासाठी पोर्नोग्राफीपासून ते समलिंगी संबंधांपर्यंत लैंगिकतेच्या सर्व आविष्कारांना मोकळीक दिली पाहिजे. फक्त ते सुरक्षित व स्वखुशीने असल्याची जबाबदारी घेतली की झालं.
-    याला सारेच मान्यता देतील यात शंकाच आहे. कारण हा व्यक्तिगत निवडीचाही प्रश्न आहे. पण यातील महत्त्वाची बाब म्हणजे आपण लैंगिकतकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवं. त्यांचं नैसर्गिकत्त्व आपण स्विकारायलं हवं. ही काही भयानक गोष्ट आहे यातून आपण दूर व्हायला हवं. निदान याची सुरुवात आपण केली तर आपली पुढची पिढी अधिक काम साक्षर व काम सकारात्मक बनेल.
२-       योनिशुचितेचं अवडंबर माजवून स्त्रियांना सतत बलात्काराच्या भीतीखाली डांबलं जातंय. स्त्रीचं चारित्र्य तिच्या जननेंद्रियात आहे, अशी समजूत उराशी बाळगून स्त्रिया संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेत काढतात. जननेंद्रियांना काही झालं तर आपल्या चारित्र्यावर डाग पडेल, स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असल्या समजुतींनी तर ही भीतीची छाया अजूनच गडद होते. आपल्या जननेंद्रियांना पुरुषांपासून धोका आहे, असं समजून जीवनातले एकेक अनुभव त्या बंद करत जातात. उदाहरणार्थ, रात्री न भटकणं किंवा भडक कपडे न घालणं. अशा कितीतरी स्वातंत्र्यांना योनिशुचितेच्या अवाजवी भयामुळे त्या मुकत जातात. स्त्रियांचं सबलीकरण करायचं असेल तर त्यांना शारिरीकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांचं मानसिक सबलीकरण केलं पाहिजे. मानसिक सबलीकरण म्हणजे योनिशुचितेचं अवडंबर मोडून काढणं. जननेंद्रियांना शरीराच्या इतर भागांपेक्षा वेगळं महत्त्व द्यायचं कारण काय? तसं वेगळं महत्त्व देऊन उभा जन्म भीतीच्या छायेत काढण्यापेक्षा या भीतीचाच समूळ नाश करावयास हवा. दुर्दैवाने जननेंद्रियांवर हल्ला झालाच तरी कोसळून जायचं कारण नाही. तो तिथे झालेला अपघात समजावा. शरीराच्या इतर अवयवांना अपघात झाला तर आपण सावरतोच ना? मग जननेंद्रियांना वेगळी वागणूक का द्यायची? कुठले कपडे हमखास घातले किंवा कुठली वेळ नेमकी टळली की लैंगिक हिंसाचाराच धोका टळेल याचीही निश्चिती नाही. याचा अर्थ मुद्दामहून जाऊन धोका ओढवून घ्यायचा नाही, पण तसं होईलंच म्हणून सतत धास्तावून जाण्याचंही कारण नाही. एकदा का धास्तीतून बाहेर पडलं की बंद करून घेतलेले अनेक अनुभव जगता येतील. आपण जितके वेगवेगळे अनुभव घेऊ तेवढी आपली जीवनाबद्दलची समजूत अधिक समंजस होईल. माझ्या मते तेच खरं सबलीकरण आहे.
बलात्काराच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे योनी हा फक्त एक अवयव आहे हे शारिरीक वास्तव स्वीकारणं. हात, पाय, नाकाला इजा झाली तर त्याला ज्या वेदना होतात त्याच वेदना इथेही होतात. त्यामुळे त्याला वेगळं महत्त्व देण्याचं कारण नाही हे आधी स्त्रियांनी समजून घ्यायला हवं. आणि त्यांच्या लोकांनीही. घरच्यांनी, समाजाने. दुसरा मुद्दा आहे मानसिकतेचा. मानसिक आघात कसा विसरायचा याचा. मी कबूल करतो की याबाबतीत मी ठामपणे सांगू शकत नाही. पण आधी सांगितल्याप्रमाणे नको ते स्पर्श सहन न होणे, आपल्या शरीरावर आपल्या मर्जीशिवाय इतरांचे स्पर्श न होऊ देणं आणि ते झालेच तर काय? मी बलात्काराचा नाही पण लैंगिक छळाचा अनुभव घेतला आहे. छळ हा गंभीर शब्द होईल. छळ नाही पण नको असलेला लैंगिक क्रिया. समलैंगिक पुरुषांनी माझ्या लिंगाला हात लावण्याचा अनुभव मी दोनतीन वेळा घेतला आहे. जे मुंबईत राहतात आणि लोकलमध्ये प्रवास करतात त्यांना कधीतरी असे अनुभव येतातच येतात. ते अनुभव मी आजही विसरलो नाही. अर्थात त्यामुळे मला काही शारिरीक, मानसिक त्रास झाला नव्हता. किंवा मी हे अनुभव माझ्या मित्रांना सांगितल्यावर त्यांनी मला वाळीत टाकलं नव्हतं. त्यांनीही त्यांचे असे अनुभव मला सांगितले होते. आणि हे सारं हसण्याच्या कल्लोळात. एखादी बलात्कारीत मुलगी हसत असा अनुभव सांगणार नाही हा यातला फरक. बलात्कार हे पुरुषांवरही होत असतात हे मात्र आपण इथे विसरायला नको. पण स्त्रियांच्या तुलनेत त्यांची तीव्रता व गांभीर्य कमी आहे. कारण योनीशुचितेची होणारी मागणी. सध्याच कौमार्य परीक्षेविषयीची एक बातमी गाजली होती. ही परीक्षा पुरुषी संस्कृतीचा परिपाक आहे. अशा बलात्कारातून मुली गर्भवती राहिल्या तर अधिकच अडचण. यातून मार्ग कसा काढायचा तर तो पुन्हा आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. तुम्ही या घटनेकडे कसं पाहता, स्वतः त्याला कसे सामोरे जाता किंवा अशा मुलीबाबत तुम्ही काय विचार करता याला इथं फार महत्त्व आहे. इतरांचं राहू द्या तुम्ही कसे या घटनेकडे बघता हे सर्वांत महत्त्वाचं. तो निकोप दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. शंका असतील तर त्या विचारा आणि प्रश्न असतील तर त्याची उत्तरं शोधा पण या समस्येवर काहीतरी भूमिका आपण प्रत्येकानं घ्यायलाच हवी. 

Comments